ढालगाव - ‘‘गेल्या चार वर्षांत भाजप-शिवसेनेच्या कारभारावर अनेक सत्ताधारी आमदार नाराज आहेत. यातील काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. तसेच जे आमदार पूर्वी राष्ट्रवादीचे होते, ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत येणार आहेत. मात्र, याबाबत १२ डिसेंबरलाच बोलेन,’’ असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकरी मेळाव्यासाठी श्री. मुंडे आले होते.
श्री. मुंडे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, आरक्षण या मुद्द्यांवर भाजप-शिवसेना सरकारची भूमिका दुटप्पी आहे. या भूमिकेला सत्ताधारी भाजपमधील काही आमदारांचा विरोध आहे. अनेकजण सरकारच्या या कारभाराला कंटाळले आहेत. त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा लवकरच पक्षात प्रवेश होईल.’
ते म्हणाले, ‘खरे पारदर्शी असाल तर सरकारने महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करावा. १६ मंत्र्यांची चौकशी लावावी आणि ९० हजार कोटींचा हिशेब द्यावा. मुख्यमंत्री कोणतीच कारवाई करत नाहीत. राज्यात केंद्रीय मंत्री सुरक्षित नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था कुठे आहे? मुख्यमंत्री काय करतात? त्यांच्याच पक्षात केंद्रातील मंत्री राज्यात सुरक्षित ठेवता येत नसतील तर राज्यातील जनतेचे काय?’ अशी टीकाही त्यांनी केली.
जानकरांना समाजाचा विसर
मंत्री महादेव जानकर यांनी बीडमध्ये धनगर समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे वक्तव्य केले असल्याबाबत विचारले असता मुंडे म्हणाले, ‘जानकरांचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे. जानकरांनी समाजाचे राजकारण करून मंत्रिपद मिळवले. आता समाजाचा विसर पडला आहे. त्यांची मानसिकता त्यांच्याच वक्तव्यातून समाजासमोर आली ते बरे झाले.’
Web Title: Dhananjay Munde said bjp's MLA'S coming soon in NCP
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.